एपिसोड

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – शेजारी बेपत्ता झाल्याचं काय लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!

नायक- काका? गायब?? … ओह्….. त्याबद्दल बोलतोयस तू . हां ते गायब आहेत दोन दिवस झाले…

नायक- ओह् हो हो, म्हणजे तुला म्हणायचं होतं धीर सोडू नकोस….. मग ठीके, मला वाटलं

मित्र – मी तेच म्हणलो… तुला काय वाटलं?

नायक – कुठं काय, ( गडबडून, गंभीर होत) बाबा गायब आहेत रे !

बाहेरच्या दारातून आवाज – नाही पोरा मी परत आलोय.

( दारावर कॅमेरा, एकदा वरून, एकदा खालून एकदा डावीकडून. मग झूम इन, त्यानंतर झूम आऊट. ढिश् झिश् फिश् असा स्पेशल इफेक्ट, मग नुसतीच भिंत. मग चुकीची दुरुस्ती करायला लगबगीनं कॅमेरा दरवाज्यातील व्यक्तीकडे.)

नायक – बाबा तुम्ही? आई, बाबा आले बघ!

( सतार वगैरे वाद्यांसकट रेग्युलर आनंदी क्षण सूचित करणारा  आवाज… मित्र फोन कट करतो, आवाज बंद)

मित्र – ओह् सॉरी, तुमचं चालू द्या

(नायक बाबांच्या दिशेने स्लो मोशन, बाबांचे हात समोर, नायकाला मिठीत घेण्यासाठी,

टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,

पुन्हा नायक, स्लो मोशन. बाबा कंटाळून हात खाली घेतात, नायक पोहोचून मिठी मारणार तोच् )

आई-  तू????????????? तुझी हिंमत तरी कशी झाली इथे यायची? (मुलाकडे बघून) आहेच तिथेस थांब. या माणसाच्या सावलीसही  उभा राहू नकोस….

मित्र – तुम्हाला “आहेस तिथेच” म्हणायचंय का? कारण आहेच तिथेस असं काही नसतं या जगात.

नायक – (गोंधळून) आई??? बाबा??? ( वैतागून) आधीच नाही का सांगायचं…. बळंच चालायला लावलं राव, एक तर ही अवस्था…

मित्र – कोणती अवस्था

नायक – कुठं काय? बाबा आलेत बघ !

आई – हा माणूस तुझा बाप नाही!!!!

(कॅमेरा आईकडे. वरून, खालून, डावीकडून, विथ स्पेशल इफेक्ट… अचानक कॅमेरा धप्पकन् आडवा… सावरून सरळ, पुन्हा आईकडे.)

आई – हा नक्कीच तो. यांचा जुळा भाऊ. एकदा फसले,  दोनदा फसले,  आता  लक्षातही नाही कितीदा फसल्ये ते पण आता फसणार नाही.

नायक – (एकाच वेळी हताश, अन् आश्चर्यचकित) आई, काय बोलत्येस तू? कोण जुळा भाऊ, कोणी फसवलं कोणाला?

आई – अरे, सोडून दे, ते मनातल्या मनाल होतं.

नायक – अं?

आई- नायकाकडे पूर्ण दुर्लक्ष करून – अत्ताच्या अत्ता चालता हो…

(तेवढ्यात आणखी एक आवाज)

आवाज – मला वाटलंच, मी गायब झाल्याचं पाहून तू इथं येशील

(आवाजाकडे कॅमेरा, स्थिर, नुसतेच साऊंड इफेक्ट्स… अस्पष्ट कुजबूज …… अरे हलव की…. नाही जा…… चक्कर…… डॉक्टरांचं बिल…. एक शिवी….)

बाबा- तू??????

आई- तुम्ही???????

मित्र- काका???????

नायक- अं???

आवाज – होय, मी परत आलोय…

बाबा१ – (कुत्सित संतापासह) मी तुला रस्त्यावर आणीन…

बाबा२- (तितक्याच कुत्सितपणे) पण मी आत आलोच कुठंय.

नायक – हा काय प्रकार आहे

आई – जरा प्लॅन चुकला खरा… यानं खीर खायला उशीर केला म्हणून. नाहीतर एव्हाना हा डॉक्टरकडे गेला असता. मग मी, ह्यांचा जुळा हा, हे आणि ह्याचा हा.

ह्या दोघा जुळ्यांना एकमेकांत जुंपून आम्ही दोघं पळून गेलो असतो. अन् नंतर गॅसच्या स्फोटाची बातमी वाचून विमा खायला आलो असतो.

नायक- काय??????????????

मित्र- (गडबडून) अरे, येतो रे मी.

बाबा१- काय???????????????

बाबा२- (आधीच्याच कुत्सितपणे) गॅस संपलाय !!!

बाबा१ – रस्त्यावर आणीन तुला

आई- मी हेसुद्धा मोठ्यानं बोलले वाटतं… असंच होतंय हल्ली…

सुमी – तरीच स्फोट नाही झाला आजून…

(तेवढ्यात एक मोठा आवाज, कॅमेरा कॅलेंडरकडे, १२ डिसेंबर २०१२, वार मात्र रविवार… मग पाणीच पाणी, कॅमेरा हळूहळू डावीकडे सरकतोय. पाण्यातच वाळू, काही वनस्पती, एक मासा समोरून निघून जातो, मागे बुडबुडे सोडणारं यंत्रं… फेड टू ब्लॅक)

अर्थमैथुन : टमरेल

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.

टमरेल.

हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )

याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)

याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे चिवट, बिकट आणि कठीण प्रसंग सहज हातावेगळे करू शकतो.

पाणी हेच जीवन…

उदाहरणादाखल पहा :
ओलिताखालील प्रदेश विरूद्ध कोरडवाहू प्रदेश
हिमालय विरूद्ध ग्रॅंड कॅन्यन
अॅमेझॉन विरूद्ध सहारा

आता हे पहा… (घाबरू नका, फक्त लिहिलेलंच वाचायला सांगतोय)
नदीचं पाणी समुद्राला मिळतं
समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
वाफेचे ढग बनतात
ते वाऱ्यासोबत वाहतात
जिथे ते ढग गार होतात तिथे पाऊस पडतो
डोंगराशी ढग आडत असल्यानं तिथे जास्त पाऊस होतो आणि जंगल निर्माण होतं.
मग काही लाकूडतोड्यांवर खर्च करून आपण ते जंगल तोडतो.
पुन्हा ट्रक, पेट्रोल वगैरे गोष्टींवर खर्च करून ती लाकडं शहरांत आणतो.
पुन्हा, कामगार, वीज, यंत्रसामुग्री वगैरेवर खर्च करून आपण त्या लाकडांचा घट्ट रस वगैरे काहीसा तयार करून त्याचा कागद तयार करतो.
स्वाभाविकच, निसर्गापासून एवढा लांबचा आणि निसर्गास घातक असा प्रवास करून आलेला कागद… त्यात निसर्गाचा तो ओलावा नसतोच मुळी…

याउलट सरकारनं धरणं तुमच्यासाठी बांधली आहेत. पाणीकपात असेल तर पर्यायानं पाण्याचा वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो. (तो कप नंतर इतर कुठे वापरू नये. )  शिवाय, नदी – समुद्र – पाऊस – झाड – ट्रक – फॅक्ट्री – दुकान – घर  यापेक्षा नदी – धरण  - घरची टाकी – नळ – टमरेल हा बराच सुटसुटीत प्रवास आहे.

कागदानं आग पसरते. आग विझवायला अग्निशामक दलही पाणीच वापरतं….

शेवटी पाणी ते पाणी आणि कागद तो कागद ( स्रोत  : आयुष्यावर बोलू काही  (कार्यक्रम) )

टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …

तळटीप -
: वाचलंतच ना इथपर्यंत… वाटलंच मला !!
:  पूर्वी रेडिओ पुणे स्टेशन वर ही फर्निचरच्या दुकानाची जाहिरात लागायची. आजूनही लागत असेल माहित नाही… त्यात “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…” अशा ओळी होत्या. त्या जाहिरातिच्या वेळेत मी नेमका अभ्यासात असायचो (नाहितर रेडिओवरच्या जाहिरातीकडे कशाला जातंय लक्ष..) तेव्हापासून जेव्हा जेव्हा “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं (रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…)”  हा वाक्प्रचार येतो तेव्हा पुढचं म्हणल्यावाचून (मनातल्या मनात का होईना) राहावत नाही.. (वाक्यात मधे कुठेतरी “स्वप्नासारखे सुंदर घर प्रत्यक्षात उतरते” अशा ओळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की आठवत नाईये. )

कैच्याकै – १

कामवाल्या बाईचा जन्म हा केवळ मोक्याच्या वेळी सुट्टी घेण्यासाठी झाला आहे.

——

मगाशी,

मारत होतो मी माशी,

खाजवत माझी मिशी

विचार करत स्वतःशी,

की अजून मेली नाही कशी.

——

मला आजवर स्वतःला शिस्त लावता आलेली नाही. पण मी इतरांना शिस्त लावू शकेन….

कारण आजवर तशी मला स्वतःला लाथही मारता आलेली नाही.

चष्टगो – १

एकदा पिंगपिंगसेन आणि मिंगमिंगलेन असे दोन राजपुत्र होते.
मिंगमिंगलेन मोठा

दोघेही राजपुत्र, पण दोघांचे वडिल वेगळे वेगळे … म्हणजे ….. आयाही तशा वेगळ्या वेगळ्याच … जसं नोर्मली असतं तसं !!
दोन्ही राजघराण्यांत फार सख्य.

पिंगपिंगसेन अणि मिंगमिंगलेन हे फॅमिली फ्रेंड्स तर होतेच , पण लंगोटी यार पण होते.

रोज एकमेकांकडे जाणं-येणं असायचं …

पण दोन्ही राज्यांच्या प्रधानांना हे मान्य नव्हतं
कारण रोज जाण्या येण्यात खर्च खूप व्हायचा
आणि मग प्रधानजींना CA ला उत्तरं द्यावी लागायची.

एकदा, दोन्ही प्रधान मिळून एक कट रचतात…
त्यांचा प्लॅन जवळजवळ तयार झालेला असतो एवढ्यात मिंगमिंगलेनच्या फॅमिलीची परत जायची वेळ होते…

ठीकाय, उद्या कंप्लीट करू म्हणत दोन्ही प्रधान एकमेकांना टाटा करतात.
प्लॅनच्या डॉक्युमेंटवर शेवटचं वाक्य असतं……

“लवकरच येत आहे !!!”