सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा)
ब्लॉग सुरू करून आता दोन वर्षे होतील. ब्लॉगवर आचरटपणा सुरू करूनही आता जवळजवळ सहा महिने लोटलेत. पण कुठेतरी पाणी मुरतंय. वैचारिक शुष्कता आली आहे. पानगळीच्या हंगामात (त.टी.१) विचारवल्लीची जीर्णपर्णे प्रतिभालतिकेशी संलग्न राहण्याचा एक कृष, असहाय प्रयत्न करून अखेर दिनचक्राच्या वैचारिक अग्नेय मोसमी वाऱ्यांबरोबर फडफड… फडफड… करत उडून जातात. असंख्यातून बचावून एखादं जीर्णपर्ण अनंत मैलांचा वैचारिक प्रवास करत असेलही कदाचित, पण त्याची सुरसिक मेंदूशी असलेली अमूर्त नाळ केव्हाच तुटलेली असते. इतकंच काय…. मज्जारज्जूंनाही हल्ली मज्जा कळत नाही. अन् मी दारूही पीत नाही.
सर्दी मे पसीना गले ना भूक ना प्यास लगे, क्या यही प्यार तो नही? असेलही कदाचित, मला माहीत नाही, (तुम डॅडी से पूछ लेना.) पण उपरिनिर्दिष्टित(त.टी.२) परिच्छेदात ( सभ्य नसाल तर त.टी.३ वाचा ) उल्लेखलेली लक्षणे मात्र तिसरीकडेच अंगुलीनिर्देश करतात. (त.टी.५) याला ब्ळॅ स्थिती असं म्हणतात. ब्ळॅ या शब्दाला अर्थ जितका अर्थ आहे त्यापेक्शा अंमळ कमी अर्थ या अवस्थेला आहे. इथे गोष्टी आपोआप सुचत नाहीत. सुचल्या तरी टिकत नाहीत. टिकले तरी ते टंकायचा कंटाळा आलेला असतो त्यामुळे असंख्य पोष्टी अशाच अटंक्यावस्थेत विरून जातात. यालाच ब्ळॅ असेही म्हणतात.
तरीपण,
मांजरं मात्र मऊ असतात. अन् ती तशी आहेत तोवर आपल्याला काळजीचं कारण नाही.
तळटीपा :
1. हंगाम म्हणलं की नेमका भाद्रपदच आठवतो राव…. काहीतरी केलं पाहिजे…
2. उपरिनिर्दिष्टित – कणेकर या शब्दाला शिंचा असे संबोधतात. मी सहमत आहे. शिंचा म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही पण शिवी वापरताना तिचा अर्थ माहीत असणं शिवीदेयकावर बंधनकारक नाही पण उच्चार अन् आवाजाचे चढउतार बरोबरच आले पाहिजेत. त्याला पर्याय नाही. खालील उदाहरण विचारात घेणे.
3. परिच्छेद हा शब्द असाही वापरता येईल : तुझ्या **** च्या ****त परिच्छेद !!!! इथे परिच्छेद या एरव्ही निरूपद्रवी शब्दाच्या सहाय्याने अत्यंत हिंसक परिणाम साधता येतील. या शब्दात योगायोगाने ‘द्’ अन् ‘च्’ ही व्यंजने येतात त्यामुळे शब्दाच्या मूळ अर्थाशी अनभिज्ञ असणाऱ्या श्रोत्यांवर वरील वाक्प्रयोगाचे परिणाम अत्यंत तीव्र भासतील.
४. ही तळटीप वर कुठेही वापरलेली नाही. पण लिहिली नसती तर हिच्यावर अन्याय केल्याचा आरोप माझ्यावर आला असता.
५. असे म्हणतात की इतरांकडे बोट दाखवताना चार बोटं स्वतःकडे असतात.अंगुलिनिर्देशाच्या एका उपपद्धतीत मात्र मध्यगा नभाकडे तर उर्वरित बोटे वसुंधरेकडे निर्देश करीत असतात.







