नांदा सौख्य भरे?

पूर्णपणे दिशाभूल करणारं शीर्षक टाकून झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो एक कहाणी.

दोन वर्षं झाली, दोघं सुखानं नांदत होते. यांचं फिस्कटेल अशी बाहेरच्या कोणाला पुसटशीही शंका आली नसती. चारआठ महिन्यांपूर्वी म्हणायला जरा घुरघुर, गरमागरमी झाली होती पण ते केवळ जवळच्यांनाच माहीत. परिस्थिती बदलली आणि ही घुरघुर कमी झाली. एकूणच प्रकरण निवळलं म्हणायला हरकत नव्हती. पण अचानक परवा त्यानं तिच्यासोबत नांदण्यास सपशेल नकार दिला. बाहेरच्यांनी हस्तक्षेपही करून पाहिला पण परिणाम शून्य… शेवटी अमेरिकेचं वारं लागलंय म्हणायचं…

“ही जोपर्यंत निघून जात नाही तोवर माझा पूर्ण असहकार असेल”, तो म्हणाला. तिचं मन फारसं मोठं नाही म्हणे… मनात सत्राशेसाठ गोष्टी असतात हिच्या, पण माझ्या जवळच्यांसाठी हिच्या मनात जागा नाही असा सरळसरळ आरोप होता त्याचा तिच्यावर. मधूनअधून भेटायला येणारी हिची मैत्रीण बरी हिच्यापेक्षा. त्रयस्थ, पण जे सांगू ते मनात साठवून ठेवते. ही मात्र…..

एरवी आत बसून शांतपणे आपलं काम चोख पार पाडणारी ती सर्व बंध तोडून बाहेर पडली. तिच्या मनाला चांगलाच धक्का होता हा. त्यातून ती सावरणं मुश्किलच.

ती गेली अन् तोही पार एकटा पडला… आता बाहेरच्यांच्या मदतीशिवाय त्याचं काहीच चालत नाही. साली “बॅड सेक्टर” वाली….. गेली तेच बरं असं समजवू पाहतोय तो स्वतःला. सध्या तो दुसऱ्या “ती”च्या शोधात आहे…

आता सांगतो नक्की काय झालं…..

परवा माझा लॅपटॉप राम म्हणल्याचं सांगितलं होतं ना. त्याचंच हे विश्लेषण. दोन वर्षं अविरत झटल्यानंतर शेवटी हार्ड डिस्क गंडली… ईन मीन एकशेवीस जीबी ची काय ती हार्ड डिस्क. भरून गेली होती. नवीन काही टाकावं म्हणलं तर आधीचं उडवायला लागायचं… तरी मधून अधून एक्सटर्नल हार्ड डिस्कवर बॅकप घेतला असल्यानं फार फोटो वगैरे आठवणी शाबूत आहेत. परवापासून लॅपटॉप  सुरू करतानाच डार्डवेअर एरर वर गोष्टी थांबायच्या. यूएसबी लावून लाईव उबुंटू सुरू करायचा प्रयत्न केला तरी पुन्हा तेच. शेवटी हार्ड डिस्क काढली. त्यानंतर कुठे लॅपटॉप उबुंटू मधे सुरू झाला. पण त्याला आला स्वतःची हार्ड डिस्क नाही. नवीन आणावी लागणार आहे. तोवर यूएसबी शिवाय काही तो चालायचा नाही.

बघू… मस्तपैकी पाचशे जीबी डिस्क टाकता येईल आता. पण आता विंडोज वगैरे नव्यानं इन्टॉल करणं आलं… कामासाठी उबुंटू ठीक आहे पण गेम्स खेळायला आणि इतर उद्योग करायला विंडोजच बरं पडतं… पुढचा वीकेंड लांबरूंद आहे त्यात या सगळ्या गोष्टी जमवता येतील. बऱ्याच दिवसांपासून लॅपटॉपचा डीवीडी रायटरही नीट चालत नाहीये त्याच्याकडेही बघता येईल. शेवटी तोही तिचाच नातलग…

चष्टगो-३

भाग-१
भाग-२

आ वासून बघणाऱ्या सशाला आता काय सांगावं असा मोठा प्रश्न अंघोळ्यापुढे पडला होता. बरं खोटा पासवर्ड तीन वेळा सांगितला तर सशाचं अस्वलात रुपांतर होऊन उघडणाऱ्यांच्या मागे लागतं मग काही धडगत नाही… आजून थोडा वेळ उघडं ठेवलं तर हा ससा स्वतःहून दार लाऊन घेतो म्हणे.

जाम चिडलेले असतात हे ससे. सहाजिकच आहे. कोणी कपाटाला कळीचा शब्द लावेपर्यंत हे जंगलात निवांत चित्तानं आपले “ससुले उद्योग” करत असतात. शब्द लावला रे लावला की ससा आहे तिथून अंतर्धान आणि कपाटात हजर. यावर कडी म्हणून त्याला वाचासुद्धा प्राप्त होते. अनुभवी लोक सांगतात की नव्वद टक्के पेक्षा जास्त ससे आल्या आल्या शिव्या द्यायला सुरूवात करतात. दार उघडून बरोबर पासवर्ड दिला की मग ससा जागच्याजागी परत जातो. दार परत लावलं की दुसरा ससा आत. दार लावावं लागलं की चिडचिड होते मग त्यांची. ऐकवणार नाहीत अशा शिव्या देत दार लावतात आणि नंतर दार उघडलं गेलं होतं हे खऱ्या मालकाला कळतं ते वेगळंच…

पासवर्ड चुकले की जाम राग येतो या सशांना, त्याचं कारण वेगळंच. सशांचा एक गुणधर्म आहे. हे आसपास असले तर एखाद्या जागेतली जादू निष्णात जादूगार किंवा मांत्रिकांनाही सहजासहजी काढता येत नाही. म्हणूनच मांत्रिक वगैरे लोक सशांची हाडं किंवा केस असलेल्या कांड्या आणि कुंचले वापरतात. ससा जवळ असेपर्यंत चोरांना तिजोऱ्या आणि कपाटं फोडता येत नाहीत. मग ते एकाला पुढे करून तीनदा चुकीचा शब्द सांगायला लावतात. मग हा शूर चोर चिडलेल्या ससा-अस्वलाला स्वतःमागे लांब पळवून आणतो आणि त्याचे उरलेले साथीदार निवांत तिजोरी फोडतात. जादू नाहीशी झाल्यावर बिचारा ससा कायम अस्वल बनून राहतो. कधीकधी जर टोळी मोठी असेल तर या अस्वलाचीपण शिकार होते. अस्वलाच्या गर्जना एकूणच जोरात असल्यानं शहरी भागात हे चोर असले उद्योग करत नाहीत पण एखाद्या दुर्गम महालात असले प्रकार झाल्याची उदाहरणं आहेत.

नाईलाज… सध्या तरी आंघोळ्या एकटाच होता आणि ससा समोर असताना जादू काढणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. तरीही ससावाल्या तिजोऱ्यांची ही माहिती आपल्या आजून लक्षात आहे हे बघून त्याला थोडं बरं वाटलं. चार वर्षापूर्वी आपण अगदीच बाळू होतो. सगळे गंडवून जायचे… एवढंच काय, स्वतः लवकरचनं गुप्तहेरी कारवाईच्या नावाखाली आपल्याला त्याच्या योजनेबाहेर ठेवलं होतं… तेव्हा नाही कळलं पण तेच काम करताकरता हळूहळू एकएक शिकत गेलो आणि मग लक्षात आलं की आपल्याला चांगलंच गंडवलंय… तरीही दिलेलं काम करत राहिल्याचा त्याला अभिमान होता. गंडवलं गेल्याबद्दल तो स्वतःवरच नाखूश होता पण लवकरच वरची त्याची निष्ठा ढळली नव्हती… नाही म्हणायला त्याला या कामाचा फायदाच झाला होता. या तिजोरीप्रमाणेच इतर बऱ्याच गोष्टींची, घडामोडींची अद्ययावत माहिती त्याला होती शिवाय स्वतःला अदृष्य ठेवण्याची कलाही त्याला चांगली जमू लागली होती. नाहीतर या कारस्थानाचा सुगावा त्याला लागलाच नसता…

काय आहे तरी काय त्या कागदपत्रांत ? लवकरचशी त्याचा काय संबंध ? या प्रधानांचं नक्की चाललंय तरी काय? आणि हा ससा दार लावायला निघाला की काय ?? आणि त्या शेवटच्या ओळीचा नक्की अर्थ काय???

‘लवकरच येत आहे’ नकळत आंघोळ्या पुटपुटला…

ससा बाजूला सरकला. कपाटाचं अंतरंग हळूहळू स्पष्ट होत गेलं…

अर्थमैथुन : टमरेल

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.

टमरेल.

हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )

याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)

याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे चिवट, बिकट आणि कठीण प्रसंग सहज हातावेगळे करू शकतो.

पाणी हेच जीवन…

उदाहरणादाखल पहा :
ओलिताखालील प्रदेश विरूद्ध कोरडवाहू प्रदेश
हिमालय विरूद्ध ग्रॅंड कॅन्यन
अॅमेझॉन विरूद्ध सहारा

आता हे पहा… (घाबरू नका, फक्त लिहिलेलंच वाचायला सांगतोय)
नदीचं पाणी समुद्राला मिळतं
समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
वाफेचे ढग बनतात
ते वाऱ्यासोबत वाहतात
जिथे ते ढग गार होतात तिथे पाऊस पडतो
डोंगराशी ढग आडत असल्यानं तिथे जास्त पाऊस होतो आणि जंगल निर्माण होतं.
मग काही लाकूडतोड्यांवर खर्च करून आपण ते जंगल तोडतो.
पुन्हा ट्रक, पेट्रोल वगैरे गोष्टींवर खर्च करून ती लाकडं शहरांत आणतो.
पुन्हा, कामगार, वीज, यंत्रसामुग्री वगैरेवर खर्च करून आपण त्या लाकडांचा घट्ट रस वगैरे काहीसा तयार करून त्याचा कागद तयार करतो.
स्वाभाविकच, निसर्गापासून एवढा लांबचा आणि निसर्गास घातक असा प्रवास करून आलेला कागद… त्यात निसर्गाचा तो ओलावा नसतोच मुळी…

याउलट सरकारनं धरणं तुमच्यासाठी बांधली आहेत. पाणीकपात असेल तर पर्यायानं पाण्याचा वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो. (तो कप नंतर इतर कुठे वापरू नये. )  शिवाय, नदी – समुद्र – पाऊस – झाड – ट्रक – फॅक्ट्री – दुकान – घर  यापेक्षा नदी – धरण  - घरची टाकी – नळ – टमरेल हा बराच सुटसुटीत प्रवास आहे.

कागदानं आग पसरते. आग विझवायला अग्निशामक दलही पाणीच वापरतं….

शेवटी पाणी ते पाणी आणि कागद तो कागद ( स्रोत  : आयुष्यावर बोलू काही  (कार्यक्रम) )

टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …

तळटीप -
: वाचलंतच ना इथपर्यंत… वाटलंच मला !!
:  पूर्वी रेडिओ पुणे स्टेशन वर ही फर्निचरच्या दुकानाची जाहिरात लागायची. आजूनही लागत असेल माहित नाही… त्यात “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…” अशा ओळी होत्या. त्या जाहिरातिच्या वेळेत मी नेमका अभ्यासात असायचो (नाहितर रेडिओवरच्या जाहिरातीकडे कशाला जातंय लक्ष..) तेव्हापासून जेव्हा जेव्हा “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं (रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…)”  हा वाक्प्रचार येतो तेव्हा पुढचं म्हणल्यावाचून (मनातल्या मनात का होईना) राहावत नाही.. (वाक्यात मधे कुठेतरी “स्वप्नासारखे सुंदर घर प्रत्यक्षात उतरते” अशा ओळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की आठवत नाईये. )

चित्रपटगृह

आज बऱ्याच दिवसांनी चित्रपट बघायला गेलो होतो. डेट नाईट. छान विनोदी चित्रपट आहे, हलकाफुलका. संसारात बुडालेलं एक जोडपं दोघांचीच अशी एक संध्याकाळ साजरी करायला एका संध्याकाळी बाहेर पडतं, दुसऱ्याच्या नावानं असलेल्या रिझर्वेशनवर टेबल मिळवतं, त्या नावामुळेच संकटात सापडतं आणि एकापाठोपाठ एक धमाल प्रसंगातून जात जात सहीसलामत बाहेरही पडतं. किमान एकदातरी बघावा असा चित्रपट नक्कीच आहे. बरेच दिवस पहायचा असं मनात होतं, आज पाहिला, बरं वाटलं.

जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. गेले बरेच वीकेंड काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं उगाच. आज जरा मूळ पदावर आल्यासारखं वाटलं. मला चित्रपटगृहांची हवा आवडते. तो पॉपकॉर्नचा मंद, गरम दरवळ, थोडी गर्दी, अंघारातल्या खुर्च्या, त्यांच्यावरून दिसणारी डोकी आणि त्या डोक्यांना काही तास गुंगवून ठेवणारा प्रकाशाचा कल्पक खेळ.

पुण्यात असताना सिटीप्राईड कोथरूड अगदी चालत पाच मिनिटांवर होतं. आईच्या मते माझ्यासाठीच बांधलंय जणू… महिन्यातून किमान दोनदा तरी जायचो. कधी कधी आठवड्यात दोनदा ही व्हायचं. चित्रपट पहायला कंपनी असलीच पाहिजे हा नियम गौण आहे. (इतका, की मला जर बायकोही अशीच मिळाली तर आम्ही एखाद्या चित्रपटाला एकत्र जाऊन एकाच खेळाची दोन लांबलांबची तिकिटं काढू की काय अशी भिती वाटते…) भयपटाला मात्र एकटा जात नाही. गटानं पाहिला तरी भयपटानंतर दोनचार दिवस दिवे चालू ठेवून झोपतो… गंभीर किंवा वेगळे विषय असणाऱ्या चित्रपटांना मात्र शक्यतो एकटं जाणं पसंद करतो कारण शेजारचा उगाच मधे काही बोलला बेक्कार चिडचिड होते. कधीकधी तर शुक्रवारी रात्री नऊला अचानक ठरवून साडेनऊच्या शो ला बसलो आहे. लास्ट शो सुद्धा बरेच पाहिलेत. आणि त्यानंतर करिश्मा – कर्वे पुतळा – वनदेवी अशी एक चक्कर. रात्री नेहेमीचे रस्तेही वेगळेच वाटतात. नंतर लिहीन कधीतरी त्याबद्दल आजचा दिवस चित्रपटगृहांचा.

लहान असताना आई-बाबांबरोबर अलका आणि विजय मधे बरेच चित्रपट पाहिलेत. विशेषकरून मराठी आणि इंग्रजी. आईबाबांबरोबर आवर्जून पाहिलेला आणि मला आठवणारे हिंदी चित्रपट म्हणजे हम हे राही प्यार के किंवा येस बॉस किंवा शाहरूख, आमिर किंवा जुही असलेले आणखी एकदोन. इंग्रजी चित्रपटच जास्त आठवतात. द माक्स, होम अलोन, रिची रिच, युनिवर्सल सोल्जर्स वगैरे. या दोन चित्रपटगृहांबद्दल जरा विशेष लगाव. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात त्यांची सध्याची अवस्था बघून वाईट वाटतं पण अंतर, आराम आणि आळस लक्षात घेता पावलं (आणि बुड) सिटिप्राईड कोथरूडकडेच वळतात.

माफी. वळायची. आता सिटीप्राईड तितकंसं जवळ नाही. इकडे येण्याआधी दोन दिवस माझ्या मामेभावाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून तिकडे रॉकेट सिंग पाहून घेतला भावंडांबरोबर. एका दगडात दोन पक्षी. माणसाचा जीवपण साला कुठेही रमतो… ठिकाणं, रस्तेही जिवाभावाचे होतात. बाहेर पडल्यावर नेहेमीची कर्वेरोड चक्कर केली. घरी पोहोचलो तेव्हा गदगदलो होतो. आपण जागेशी कसे बांधले जातो याचाच विचार करत होतो. पोटात मोठ्ठा गोळा आला होता. मन सगळ्या जागा तिकडे साठवू बघत होतं जणू…

सध्या जिथे राहतो तिथून जवळच एक चित्रपटगृह आहे. अगदी ताजेतवाने गरम चित्रपट नसतात तिथे पण आजवर जी नावं पाहिली ती सगळी चांगली होती. मला आवडतात तशी वेगळ्या, विनोदी किंवा गंभीर प्रकारात मोडणारी. आजवर तरी नावंच पाहिल्येत. आत जायची इच्छा मात्र टाळल्ये. सवय होईल या भितीमुळे असेल कदाचित. नाहीतर आळस आहेच कारण म्हणून. (गंमत आहे. एखादी गोष्ट करावीशी न वाटण्यात ‘आळस’ फार उत्साहानं पुढाकार घेतो. )

असो. जाईन आता कधीतरी.

पुढच्या महिन्यात आयर्न मॅन – २ येतोय. रसेल क्रो (ग्लॅडिएटर) रॉबिन हूड म्हणून येतोय. आणि गेमचं नाव जसंच्या तसं धारण करून प्रिन्स ऑफ पर्शिया : सॅण्डस ऑफ टाईम सुद्धा येऊ घातलाय. रॉबिन हूड वगळता बाकी दोन्ही कावळा तंगवू शकणारे आहेत. त्यामुळे पाहिलेच पाहिजेत !

आपला
~नॅकोबा

उगाच

मी
बोर
झालोय.
काय करू
सुचत नाईये
आता वीकेंड आहे.
हातात लॅपटॉप आहे.
वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टचा
रतीब लावायचा योग आहे
आजची पोस्ट उगाच करतोय.
काही बरं लिहून पूर्ण होत नाईये.
ड्राफ्ट्स करून करून कंटाळा आलाय.
आठवडा तसा व्यस्त होता. काम होतं बरंच.
डोकं चालवून चालवून सुद्धा दमायला होतं खरंच
तिरकी पोस्ट करायला अशी डोकं तेवढंच तिरकं हवं.
जुन्या पोष्टीतल्या पाचकळ त्रिकोणाचं हे मराठी रूप नवं

चष्टगो – २

पूर्वार्ध : चष्टगो – १

पिंगपिंगसेन हे क्वाग्रीच राजघराण्याचं शेंडेफळ. बबन क्वाग्रीच हा त्या सत्तेचा चौथा वारसदार. वास्तविक बबन स्वतः तसा साधाच, स्वभावाला मृदू. एरवी राजसत्तेवर आलाच नसता. बबनचा भाऊ, अजिंक्य क्वाग्रीच हा एक अतिशय शूर, मुत्सद्दी राजा. त्याच्या अल्प कारकीर्दीत त्यानं आपासच्या सर्व राज्यांशी योग्य ते सर्व मार्ग वापरून शांतता नाहीतर सख्य प्रस्थापित केलं होतं. सैन्याची व्यवस्थाही अगदी चोख होती. बिचारा ड्रॅगनच्या अपघातात गेला.

अजिंक्यला एक मुलगा होता ‘लवकरच’. तो तर महायोद्धा म्हणून प्रसिद्ध. ‘लवकरच येत आहे’ अशी आरोळी ऐकली की शत्रूचे सैनिक चळाचळा कापायला लागायचे. बापाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचा काका सत्तेवर आला. ही बातमी कळल्याच्या तिरऱ्याच दिवशी लवकरच त्याच्या छावणीसकट गायब झाला. लोकांमधे अनेक अफवा आहेत पण जो एक घाबरलेला सैनिक सापडला त्यानं सांगितलं की लवकरच नं स्वतःचा प्रचंड शक्तिशाली स्फोट घडवून आणला, छावणीतल्या सगळ्यांची वाफ केली आणि नंतर अंतर्धान पावला. तेव्हा हा सैनिक अंघोळ करत होता म्हणे…

मिंगमिंगलेन बस्तिडा, शुशार बस्तिडा या राजाचा एकमेव वारस… मोठ्या प्रयत्नानंतर राजाला मिळालेलं हे रत्न. शुशार राजानं आधी खूप उपाय करून पाहिले, बडे बडे हकीम झाले, वैद्य झाले, देशोदेशीचे विद्वान झाले, अगदी तांत्रिक मांत्रिक सुद्धा झाले पण परिणाम शून्य, शेवटी या सर्वांना कंटाळून राजानं लग्न केलं… बाकी हा राजा तसा कर्तुत्ववान होताच… लवकरच शोधण्यासाठी यानंही जंग जंग पछाडलं पण काही हाती लागलं नाही. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटली होती.

आज मात्र तो अंघोळ्या सैनिक हैराण झाला होता. दोन्ही प्रधान ‘टाटा’ म्हणून गेल्यावर हा हळूच त्याच्या अदृष्य वेशातून बाहेर आला आणि नुकतंच कुलूपबंद केलेलं दस्ताऐवजांचं कपाट त्यानं मोठ्या शिताफीनं उघडलं… समोर बघतो तर एक ससा आ वासून उभा… “शिट्.. पासवर्ड… लागली वाट !”, वैतागून अंघोळ्या स्वतःशीच म्हणाला… काहीतरी करायलाच हवं होतं… त्या कागदावरचं  त्याच्या दृष्टीस पडलेलं शेवटचं वाक्य एकसारखं त्याच्या मनात घुटमळत होतं…

लवकरच येत आहे….

अर्थमैथुन : बांबूच्या वाटेवरचे घोडेस्वार

“आज माझी चांगलीच लागली” ऐकला असेलच हा वाक्यप्रयोग तुम्ही. वापरलाही असेल कदाचित. पाचावर धारण बसली, बिकट परिस्थिती आली, तोंडचं पाणी पळालं की माणसाला हे शब्द सुचतात. काहीतरी बेक्कार किस्सा झालेला असतो आणि आपण संकटात सापडलेलो असतो. परीक्षा असते आणि ऑप्शनला टाकलेल्या भागातलेच प्रश्न अनिवार्य म्हणून आलेले असतात, गोंडस मैत्रिणीसोबत फिरताना गर्लफ्रेंड समोर आलेली असते किंवा बकुळीच्या फुलांचा खजिना घरच्यांना सापडण्यापासून थोडक्यात वाचलेला असतो. अशा वेळी “आज माझी चांगलीच लागली” हे शब्द सुचणं रास्तच आहे.

हो… ठीक आहे… लागली  वगैरे सगळं ठीक आहे…
पण नक्की काय लागली???

जर तुम्हाला सुचलेलं पहिलं उत्तर सांगण्यासारखं नसेल ( नसणारच !! ) तर खंग्राज्युलेशचंद (विंग्रजीत कॉंग्रॅज्युलेशन्स) वुई ( विंग्रजीत वी, स्रोत : तर्खडकर भाषांतरपाठमाला वा तत्सम पुस्तिका ) हॅव ए विनर !!! (  हा कंस वाचू नये. )

आता थोडेसे लहान (किंवा सभ्य, शामळू वगैरे) झालात तर तुम्हाला यातून एक वाट दिसेल. हीच ती वाट. काही श्यंकट आलं की आपली लागते ती म्हणजे वाट (वाटलंच होतं…)!  तसं बघायला गेलं तर वाट ही तिच्या जागी स्थिर. “ही वाट कुठे जाते?” वाल्या विनोदाप्रमाणे, ती कुठेही जात नाही. याउलट, प्रवासादरम्यान आपणच कोणत्यातरी वळणावर एखाद्या वाटेला लागतो. अगदीच जर आपणच लागायचं असेल तर मग वाट सोडून आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. बरा वाईट कसाही असो पण आपण मात्र मार्गी लागतो. ( तसे आपण नादीही लागतो, पण  नादच खुळा त्याला आपण तरी काय करणार ! ) (संगतीलाही लागतो, हरकत नाही… फक्त काना,मात्रा, वेलांटीचं भान असू द्या.. नाहीतर…. असो…..)

हां. तर मार्ग… हा मार्ग चांगला असेल तर प्रश्नच नाही. (प्रश्न असा की उत्तर काय ? )  पण जर मार्ग वाईट असेल तर मात्र आपली पार वाट लागून आपण रस्त्यावर येऊ शकतो आणि कालांतरानं धक्क्यालाही लागू शकतो… ही धक्क्याला लागायची वेळ येईपर्यंत माणसाचं प्रचंड आर्थिक नुस्कान (तस्कर, स्कंधस्नायू, मुस्काड, बिस्किट, स्कोडा, स्किन, स्किल, स्क्रू … स्क्या स्क्या स्क्या !!! स्कायपण स्काललंय :D ) होऊ शकतं. एवढ्या मेजर स्केलवर (पुन्हा स्क…) निस्कान (…) काय असं  फस्कन (…) होत नसतं… या धक्क्याला लागेपर्यंतच्या वाटेवर अनेकदा घोडे आणि बांबू लागलेले असतात.

आता घोडा आणि बांबूच का ?? मी फार खोलात(!) जाणार नाही. घोडा हे तसं श्रीमंती जनावर, शिवाय हा रेसमधेही असतो, घोड्यांच्या रेसवर मजबूत पैसा लागतो(!) त्यामुळे घोड्याचा त्यातल्यात्यात पैशाशी किंवा नुकसानाशी संबंध लावता येईल.  पण बांबूचं काय???

बांबू हे पांडांचं आवडतं खाद्य, (पांडा हा एक अस्वलप्रजातीय प्राणी आहे (माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यानुसारच तो मऊही आहे…), तोही नामशेष होत चालला आहे. त्यांची लागणारी वाट थांबवली नाही तर लवकरच पांडा ही प्रजाती धक्क्याला लागेल…) पांडा चीनमधे असतात, बांबूही… चीनी बनावटीच्या वस्तू कशा… स्वस्त पण सहा महिन्यात बत्तीगुल… मग आपलं नुसकान !!! (नुस्कान, नुस्कान, नुस्कान… उद्या शंभर वेळा लिहून आण !!! ) म्हणून बांबूही आर्थिक तोट्याशी निगडित (निगडी सोडून आमची इतर कोठेही शाखा नाही…).

एवढं लिहून मी ही बांबूंची लागवड संपवतो.

तरी, सूज्ञांनी (आणि तुम्हीसुद्धा) या बांबूच्या वाटेवरील घोड्यांचा लागेल तसा वापर करा आणि काही लागलंच तर निःसंकोचपणे मागून घ्या….

आपला,

नॅकोबा.

खरपूस

” यू सी, खरपूस इज ए स्टेट ऑफ फूड बिईंग रोस्टेड. इट लाईज समव्हेअर स्लाईटली आफ्टर ‘वेल रोस्टेड’ बट डेफिनटली बिफोर बर्न्ट ऑर टोस्टेड. इट्स दि अल्टिमेट बार्बेक्यूइश टेस्ट ऑफन ऑब्जर्वड इन फूड्स बिईंग रोस्टेड ऑर फ्राईड. ”

आज संध्याकाळी मी आणि माझा रूममेट यांच्यात झालेलं हे संभाषण. तो मराठी व्यवस्थित बोलतो पण खरपूस शब्द त्याला नवाच होता. खरं तर वरची व्याख्या ही फारच मोघम आहे. खरपूस हा शब्द वासाशिवाय किंवा चवीशिवाय सांगणं ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे असं मला वाटतं.
आज दिवसभर हीटर चालू राहिला होता त्यामुळे ऑफिसमधून परत येईपर्यंत घराचा जसपाल झाला होता (घराची भट्टी झाली होती ) म्हणून दार उघडं टाकून बसलो होतो तेवढ्यात कुठूनतरी माशांचा मस्त खरपूस वास आला. मस्त वाटलं.

खमंग आणि खुसखुशीत हेही मला असेच अस्पष्टकरणीय वाटतात. चकली, बाकरवडी, शंकरपाळे या गोष्टी पोटात जाता जाता या शब्दांचे अर्थ मेंदूत साठवून जातात.
“ती” चव, फक्त अनुभवता येते. पद्धत सारखी असली तरी आजीची पोळी आईच्या पोळीपेक्षा वेगळी लागते.
“तो” वास काही क्षणच टिकतो, आणि रसना ढवळता ढवळता मंद होत जातो. जाताना कुठेतरी डोक्यात एक गजर लावून जातो, रोज दुपारी फ्रिज उघडायचा.
कॅड-बी मधे एवढं काय आहे याचं “एकदा खाऊन तर बघ !” हे एकमेव उत्तर असतं.

चव, वास, संवेदना… या जाणिवांचं वर्णन एखादा उपजत साहित्यिकच करू जाणे.
चवीचंच म्हणायचं झालं तर मी आपला केवळ खाल्ल्या तिखटाला जागतो… ( किंवा पाचक घेऊन झोपतो. )

आपला
~नॅकोबा

शुद्ध पाचकळपणा

बरेच दिवस झाले, मनसोक्त पाचकळपणा करता आलेला नाही. मराठीत निरर्थक, आचरट, पाचकळ बोलायला मला काहीच प्रयत्न लागत नाहीत. इंग्रजीतमात्र कितीही प्रयत्न केले तरी तितकंसं चांगलं जमत नाही. आता जवळजवळ चार महिने होत आले. मी कोणाला “तू मजेत, काय सांगतोस, मगाचपर्यंत मी तुला <समोरच्यातं नाव> समजत होतो” हा वाक्प्रयोग करून चकवलं नाहीये का कोणाला “अरे, तू किती चांगला आहेस…. सध्या” असं पुणेरी तूप लावलं नाहीये. पालच चुकल्याचुकल्याशाख्खं वात्तंय.

खी खी…

चटईवर चालणारा चतुर चोर चमच्यातला चुका चाखून चरकला. “चुक्याला चव चुन्याची ?? चांगलं चाललंय” चोर चिरकला…

“चुकून, चुना चमच्यावर चढला..” चड्डीपैलवान चेतन चाचरला…

हे असं सुचतं मग उगाच…

आज एवढंच. झोप आल्ये, मन बुंगाट सुटलंय, बोटांना मात्र वेगमर्यादा आहे.

वाटलेला नवलकोल हे शब्द नवल वाटणे या अर्थानं वापरायचे होते कुठेतरी पण पोस्ट संपवायची प्रचंड इच्छा होते आहे.

उद्या बघतो जमलं तर…

आपला,

~चॅकोबा !!! (च्या च्या च्या)

मांजर इतकं मऊ का असतं?

मांजर इतकं मऊ का असतं?


मांजर मऊ असतं का?
मांजर हा उपद्रव ठरू शकतं का?
उपद्रवी मांजरावर उतारा म्हणून मालकाने कोणता द्रव घ्यावा?
द्रवाचा अंमल जाणवत असताना मांजर मधे आल्यास काय होईल?

06052009462.jpg

तुम्ही मांजर पाळाल का?
तुम्ही आजून काय काय पाळाल ? (कुत्रा, ससा, कायदा, सिग्नल वगैरे…)
घरच्या मांजराचं महत्व किती?
कोणी एक धनू जर तिच्या घरधन्याने धावून धावून जमवलेल्या धनापैकी निम्मं धन घरच्या बन्या बोक्याच्या सुशोभितीकरणास खर्च करत असेल तर ते योग्य की अयोग्य?
हा धनी जर धनूच्या ताटाखालचं मांजर असेल तर परिस्थितीत काय फरक पडेल ?
धन्या आणि बन्यापैकी कोणत्या मांजराचा मालकिणीवर जास्त अधिकार असेल?
लग्नानंतर मुलीबरोबर तिचं पाळीव मांजर सासरी जाउ शकतं का?
तेव्हा त्या मांजराचं नाव बदलण्याबद्दल तुमची मतं काय?
व्याहीभोजनात मांजराची जागा कुठे?

हे आणि यासारखे बरेच प्रश्न मला उगाच पडतात…
काही दिवसांपूर्वी एके कम्युनिटिवर हा टॉपिक टाकला होता. काळाच्या ओघात तो उडाला. बरेच दिवस तो ईमेलमधे टिकून होता, आज म्हणलं इकडे टाकावा. तेवढीच थोडी मज्जा !

22012009319.jpg

आपला,

~नॅकोबा