सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही झालेले… कधीकधी मात्र आपापल्या मी ला धरून ठेवण्याच्या फोल आग्रहात अडकलेले. कधी आम्ही इतका घट्ट की मी म्हणून खपून जाईल. कधी मात्र प्रश्न पडावा की मीच इतके वेगळे, आम्ही झालेच कसे. हे बघतो मी. मग जाणवतं. सर्वनामं जास्त झाल्येत.

मीपण वाढतंय आणि असे “मी”पण वाढलेत.

काम चालू… मेंदू बंद.

हल्ली (चायला) पोष्टी सुचत नाईयेत. म्हणजे सुचतायत पण पूर्ण नाही.

असं कसं? अर्धवट कसं सुचू शकतं ? असं होतं का कधी, काहीतरीच अपलं तुझं.

सुचू शकतं.

का?

मी जे काय बोलतोय तो प्रत्येक शब्द आणि त्यामागचं कारण माहीत असावं हा बंगलोरी नियम मला मान्य नाही.

बंगलोरी का?

कारण पुणेरी नाही म्हणून.

हो का?

बोका !

बोका कुठून आला?

बोका मऊ असतो.

हो पण आला कुठून

मऊ

कुठून

रशिया

रशिया का काय संबंध?

रशिया हा देश मला वाक्यात वापरायला आवडतो.

बरं मग?

मग नाही कप.

कपात काय

चहा, पाणी, वीज.

हं.

संपले का प्रश्न. आता मी

विचार

जर पाणी सुपर कंडक्टर तर मग सुपर ड्रायवर कोण? ख्या ख्या ख्या

फल्तू प्रश्न नकोत.

का?

या प्रश्नाला काही उत्तर नाही.

असं नस्तं. कोणत्याही प्रश्नाला उत्तर हे असतंच. फक्त ते बरोबर असेलच असं नाही. आणि चुकू म्हणून उत्तर न देणं ही एक मोठी चूक आहे.

चूकभूल द्यावी घ्यावी.

तू मला चूक दे, मी तुला भूल देतो.

चूक कशी देणार?

पुन्हा प्रश्न… चूक रे आपली हाडवैरच्या दुकानात मिळणारी, येईल की देता. बर, एक नाही मिळाली तर सरळ चुका आणायचा आणि म्हणायचं… चुका घ्या…

दवे बाई, शीर्षकाचा कुठेच काही संबंध नाही…

दवे बाई कोण ?

दवे बाई म्हणजे बाय द वे, ख्या ख्या ख्या

आयला, जमलं की तुला पण

मंग! शेवटी मन कोणाचं आहे !!!

~नॅकोबा

विचार : सुचणारे, सुटणारे आणि सुजणारे

विचार.
नक्की काय असतं माहीत नाही. फक्त ते डोक्यात करता येतात किंवा आपोआप येतात. काय, कसे वगैरेवर आजून फार विचार केला नाहिये. तसला विचार आज करून बघायला हरकत नाही. विचारांबद्दल तसा बऱ्याच अनुषंगानं विचार करता येईल. विचार कसे सुचतात हे मला नक्की माहीत नाही. ते बऱ्याच घटकांवर अवलंबून असतात (असावेत). परिस्थिती, आठवणी, अनुभव ( अनुभव म्हणजे आठवणींवर केलेला आणि लक्षात ठेवलेला विचार का हो ? ), संस्कार ( हे बहुदा विचारांचं गाळणं असावं. विकृतीला कृतीपासून दूर ठेवणारं ) वगैरे त्यातले काही प्राथमिक घटक (असावेत… , एक काम करा नं… प्रत्येक वाक्यानंतर असा एखादा संदिग्धतादर्शक जोडून घ्या. त्याचं काय आहे, विचार, मन वगैरे गोष्टींबाबत मज पामरास अधिकारवाणी नाही. केवळ एक प्रयत्न आहे. मन, विचार म्हणजे काय ते समजून घेण्याचा एक स्वाध्याय (होतं, असंही होतं कधीकधी…) ).

सुचलेले विचार : हे बहुदा एखाद्या प्रक्रियेचा भाग असतात यांना ठराविक दिशा असते. एखाद्या प्रश्नाची, कोड्याची उकल करताना हे उत्तर किंवा उत्तराप्रत पोहोचण्याची पायरी म्हणून समोर येतात. त्या मानाने हे शांत असतात. यांच्यास संदिग्धता नसते, असलीच तरी ती पुढच्या निःसंदिग्धतेकडे प्रवास करणारी असते. “पेट्रोल कमी आहे, उशीरही झालाय, पंपावर जावं की निमूट घरी जावं” या प्रकारचे.

सुटलेले विचार : हेही सुचतातच, पण एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे. कलिंगड किंवा काकडीला जसं पाणी सुटतं ना तसे हे मनाला किंवा इतर विचारांना सुटतात. मूळ विचारांना फाट्यांसारखे फुटतात आणि झरझर पसरत जातात. वेळीच थांबवली नाही तर ही वेल मूळ विषयाला गुरफटून टाकते. सैतानाच्या कार्यशाळेचं ( डेविल्स वर्कशॉप ) हे पहिलं उत्पादन. उत्तराकडे नेण्यापेक्षा हे पर्याय निर्माण करणारे आणि पर्यायाने गोंधळात टाकणारे असतात.  या बायप्रॉडक्ट्सना गाळून घ्यायची गरज असते. वरचंच उदाहरण,

पेट्रोल संपलंय, उशीरही झालाय , पंपावर जावं की निमूट घरी जावं.
पंपावर गेलो तर येता येता पक्यालाही भेटता येईल, कॅफेवर पडीक असतो तो या वेळी.
मॅक-डी पण जवळच आहे, फोन टाकून तिकडेच भेटावं. फोन करून घरीही तसं कळवावं. म्हणजे वाट बघणार नाहीत.
शुक्रवार आहे, आज उशीच झालेलं चालतं. काय रोजरोज थोडीच बाहेर जातो…

दाबेलीची गाडी पाहिल्यावर होणारी तीव्र इच्छा, चहाची तल्लफ, खरेदीची मधूनच येणारी हुक्की वगैरे आणखी काही उदाहरणं. डेडलाईनचं टेंशन, होमवर्क न झाल्यानं मारावीशी वाटणारी बुट्टी, परिक्षेच्या आधी पोटात येणारा गोळा हे सगळे सुटलेले विचार. हे हवे असतातच असं नाही पण येतात. थोड्याफार प्रयत्नांनी त्यांना दूर ढकलता येतं.

सुजणारे विचार :  हा प्रकार फार तीव्र आणि गंभीर… हे सुटलेल्या विचारांसारखेच येतात फक्त यांचा वेग आणि तीव्रता प्रचंड असते. आणि हे आले तरी आपण यांच्याबाबत काही करू शकत नाही. आपण त्यांना थांबवूही शकत नाही किंवा ते कृतीतही आणू शकत नाही. त्यामुळे एक अपरिहार्यता आपसूकच येते यांच्याबरोबर. आणि काही तीव्र भावना. राग, द्वेश, निराशा, दुःख अशा टोकाच्या भावना. मुकामार लागल्यावर तो भाग जसा सुजतो आणि ठसठसत राहतो तसे हे विचार ही खदखदत राहतात, बराच काळ. एक ठळक वेदना मनात उमटत राहते. बाकी कोणताही विचार करावासा वाटत नाही, जागाच नसते बहुदा मनात…

उदाहरणं ? तुम्हाला सापडलीच असतील एव्हाना.

मुद्दाम सांगत नाही. त्या विचारांच्या आठवणीही ती सूज परत आणू शकतात.

फेसबुक, फार्मविल आणि

भर दुपारी मस्त फेसबुकावर माफियांच्या विश्वात खळबख माजवत होतो. जरा वेळाने उर्जा संपल्यावर म्हणलं आता जरा शेतीकडे वळावं, शेवटी काही झालं तरी आपण शेतीप्रधान देशाचे नागरिक ! शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय कोण म्हणतं.. इकडे मीतर रोज माझ्या मित्रांच्या शेतावर खतपाणी करतोय!! सध्या इस्टर म्हणून सवंगड्यांना फुकटची खोटी रंगीत अंडी पाठवतोय आणि माझे मित्रही हिरीरीने या शेतीप्रकल्पात सहभागी होत आहेत. आहे की नाई मज्जा. जोश्याच्या शेतावरच्या कोंबड्या भुकेल्या आहेत पाहून नेने त्यांना पौष्टिक धान्य खाऊ घालताहेत. वाळून गेलेलं धान्य परत उगवता येतंय . सारं काही आलबेल आहे.
फार्मविलची सध्या बेक्कार हवा आहे. फेसबुकावरचा जो दिसतोय तो शेतावर काय घडलंय सांगतोय. दिवसातला थोडा वेळ काढून या खोट्याखोट्या शेतावर लक्ष देतोय, कापणी करतोय, प्राणी पाळतोय वगैरे वगैरे. माझ्य़ासारखे काही गेमाड लोक तर व्यसन लागल्यासारखे खेळतायत. काही जण तर दमड्या मोजून फार्म कॅशही घेत असतील. आणि फार्मविलचे निर्माते झिंगा गेम्स तर अशा खेळांवर खोऱ्यानं पैसा ओढतायत.

खरंतर ही पोस्ट दुसरंच काहीतरी लिहायला घेतली होती पण काहीतरी वेगळंच घडलं. वरचं ते शेतीप्रधान देशाचं वाक्य लिहिलं आणि पेपरात वाचलेल्या बातम्या आठवल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आणि कर्जमाफीसाठी नेत्यांनी चालवलेल्या खेळांच्या. आणि आपण खेळातल्या एका खोट्या जगात सर्वकाही आलबेल असल्यासारखं वागतोय या भावनेने क्षणभर मनाला चटका बसला. आणि डोक्यात उगाचच एक विचार आला, की समजा उद्या एखाद्या ना-नफा-ना-तोटा संस्थेनं असले व्यसनमयी गेम काढले आणि त्यातून मिळाणारे थेट किंवा जाहिरातीचे उत्पन्न सत्कार्यासाठी वापरलं तर काय होईल? शिवाय चार सहा डिझायनर्स डेवलपर्सना नोकरी मिळेल ती वेगळीच.

गेली दहा वर्षं वेगवेगळे गेम खेळतोय, निर्लज्जपणे, पुढेही खेळीन, त्याच निर्लज्जपणानं… पण आज पहिल्यांदाच मी कन्फ्यूज झालोय. आणि गेम्स वाईट कसे नाहीत, उलट त्यांचा फायदेशीर वापर कसा करता येईल हे स्वतःला पटवू पाहतोय. मी गुत्त्याच्या मालकाकडून जनकल्याणाची अपेक्षा करतोय का? का गेम्स खरंच वाईट असतात… माझ्या गेमर सांप्रदायिकतेवर घाला घालण्याचं काम इतके दिवस आई करायची, आज मी नकळत तेच करतोय… का ते माहीत नाही, म्हणूनतर इतका गोंधळलोय… ही पोस्ट मला अजून एकही तास ड्राफ्टमधे ठेवायची नाहीये म्हणून तुटकच संपवून मोकळा होतोय.

इतकंच !

कायदा, गे आणि लिव इन रिलेशन

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट आणि नंतर गंभीर मतं व्यक्त करून मोकळा होतो. बाकी तसा माझा राजकारण किंवा समाजकारण या गोष्टींशी संबंध नाही आणि अभ्यास तर मुळीच नाही. (खरं तर मी पुण्याचा आहे एवढंच कारण पुरेसं आहे, पण…)

आज मी एवढं पेटायचं कारण म्हणजे च्यायला एवढी इंट्रेश्टिंग बातमी आणि एकाही मित्रानं साधी ऑनलाईन हिंट पण दिली नाही… अरे… काय चाललंय काय ! कित्येक दिवस मी या बातमीची, निर्णयाची वाट पाहात होतो… (तशी मी ‘फालतू लोकांना मारण्यास कायदेशीर परवानगी’ या बातमीचीही वाट बघतोय, आणि ती आली तरी मी काय लगेच उठून एकता कपूर किंवा हिमेश रेशमिया मागे लागेन असं नाही. हे म्हणजे आत्महत्येस परवानगी मिळाल्यास पंख्यांच्या व्यवसायास बरकत येईल किंवा टेरेस गार्डन्स मधे गर्दी वाढेल म्हणण्यासारखं आहे. ) जुन्या ऑफिसातील माझ्या एका कलीगने मला सल्ला दिला होता ‘तू लिव इन रिलेशनमधेच रहा अरे, तुला परफेक्ट आहे’. तेव्हापासून या ऑप्शनसाठी माझ्या जिवाचा चातक झाला होता. (वरचा कंस पुन्हा वाचावा). एकदा एका मुलीला ‘तू गोंडस दिसतेस’ असं सरळ तिच्या तोंडावर म्हणलं तर पुढचे पंधरा दिवस ती कॉलेजात दिसली नव्हती… त्यामुळे पर्याय खुला होऊन जो काय उजेड पडेल तो पडेल, पण पर्याय असणं महत्वाचं. यातूनच निर्णयस्वतंत्र्याचं चित्र उभारण्यास मदत होते.

या निर्णयानं काही जणांना आपले जिवलग शोधण्यास मदत होईल, मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित जुळवून घेण्यास त्यांना जास्त वेळ आणि जवळीक मिळेल. केवळ कायदा आला म्हणून आपला किंवा आपली पाल्य त्याचा वापर करेल असं तुम्हाला वाटत असेत तर परत एकदा वरचा कंस वाचा. आपण मराठी लोक ज्याला संस्कार म्हणतो ( सीरीयलमधले संस्कार वेगळे, आपले संस्कार वेगळे ) ते तकलादू नाहीत.

गे या शब्दाशी माझी जवळीक आहे ती गेमर या नात्यानं. मी गेमर आहे म्हणजे गे-मर अशा कोणत्यातरी समलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या संघटनेचा मेंबर आहे असं नाही. मी कॉम्प्यूटर गेम्स खेळतो म्हणून गेमर. मल्टिप्लेअर. कॅफेत मल्टिप्लेअर गेम्स खेळताना कमीत कमी वेळात एकमेकांना जास्तीत जास्त शिव्या देता येणं ही एक मोठी स्पृहणीय कला आहे. तिथे हा एकाक्षरी शब्द जादू करून जातो. खेळता खेळता खेळीमेळीत एकमेकांना उद्देशलेल्या या शब्दलीलांनी खेळाडूंमधली जवळीक वाढीस लागते (इथे कोणतेही चावट विचार नकोयत…) तसेच अधूनमधून घरच्यांची आठवण करून दिल्यानं खेळाडूंची कौटुंबिक ओढही वाढीस लागते.

आता गे कायदा म्हणाल तर त्याच्याशी मला खरंच काही देणंघेणं नाही. जोपर्यंत एखादा मुलगा ‘मला तुझी चड्डी आवडली’ असं माझ्या ब्लॉगवरच्या पोस्टला उद्देशून बोलतोय तोवर मला चिंतेचं कारण नाही. आणि कितीही झालं तरी तो वरचा कंस आहेच की, हिमेशवाला… या कायद्यानं अगदीच काही वाईट होईल असं नाही काही. विचार करा, एखाद्या नवसुगृहिणीला एका रम्य अनपेक्षित सायंकाळी आपला नवरा त्याच्या लंगोटी (आहा !!) मित्राबरोबर घोडा घोडा खेळताना दिसला तर बिचारीवर काय गुदरेल? त्यापेक्षा हा गुण्या आणि तो गोविंदा गुण्यागोविंदानं नांदले तर काय वाईट आहे?

प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. त्यातली एकच बाजू बघायची, दोन्ही बाजू व्यवस्थित बघायच्या का सरळ त्या नाण्याच्या दोन सिगारेटी घेऊन चिंता धुरात विलीन करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आता एवढं लिहून मी माझी ही पोस्ट संपवतो आणि मला बातमी न सांगणाऱ्या मित्रांचा फोनवरून समाचार घेतो,

नमस्कार,

आपला,

नॅकोबा

(मी सिगरेट पीत नाही)