सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही झालेले… कधीकधी मात्र आपापल्या मी ला धरून ठेवण्याच्या फोल आग्रहात अडकलेले. कधी आम्ही इतका घट्ट की मी म्हणून खपून जाईल. कधी मात्र प्रश्न पडावा की मीच इतके वेगळे, आम्ही झालेच कसे. हे बघतो मी. मग जाणवतं. सर्वनामं जास्त झाल्येत.

मीपण वाढतंय आणि असे “मी”पण वाढलेत.

अर्थमैथुन : हातचा

हातचा

हातोटी

हातभट्टी

हातखंबा

हातघाई

हातमाग

हातभार

हस्तकला

हस्तोद्योग

हातसफाई

हातचलाखी

हसतमुख

हस्तांदोलन

हातमिळवणी

हस्तमुखप्रक्षालन

छे!!! पार हाताबाहेर गेलेली केस आहे…..

अर्थमैथुन : टमरेल

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.

टमरेल.

हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )

याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)

याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे चिवट, बिकट आणि कठीण प्रसंग सहज हातावेगळे करू शकतो.

पाणी हेच जीवन…

उदाहरणादाखल पहा :
ओलिताखालील प्रदेश विरूद्ध कोरडवाहू प्रदेश
हिमालय विरूद्ध ग्रॅंड कॅन्यन
अॅमेझॉन विरूद्ध सहारा

आता हे पहा… (घाबरू नका, फक्त लिहिलेलंच वाचायला सांगतोय)
नदीचं पाणी समुद्राला मिळतं
समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
वाफेचे ढग बनतात
ते वाऱ्यासोबत वाहतात
जिथे ते ढग गार होतात तिथे पाऊस पडतो
डोंगराशी ढग आडत असल्यानं तिथे जास्त पाऊस होतो आणि जंगल निर्माण होतं.
मग काही लाकूडतोड्यांवर खर्च करून आपण ते जंगल तोडतो.
पुन्हा ट्रक, पेट्रोल वगैरे गोष्टींवर खर्च करून ती लाकडं शहरांत आणतो.
पुन्हा, कामगार, वीज, यंत्रसामुग्री वगैरेवर खर्च करून आपण त्या लाकडांचा घट्ट रस वगैरे काहीसा तयार करून त्याचा कागद तयार करतो.
स्वाभाविकच, निसर्गापासून एवढा लांबचा आणि निसर्गास घातक असा प्रवास करून आलेला कागद… त्यात निसर्गाचा तो ओलावा नसतोच मुळी…

याउलट सरकारनं धरणं तुमच्यासाठी बांधली आहेत. पाणीकपात असेल तर पर्यायानं पाण्याचा वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो. (तो कप नंतर इतर कुठे वापरू नये. )  शिवाय, नदी – समुद्र – पाऊस – झाड – ट्रक – फॅक्ट्री – दुकान – घर  यापेक्षा नदी – धरण  - घरची टाकी – नळ – टमरेल हा बराच सुटसुटीत प्रवास आहे.

कागदानं आग पसरते. आग विझवायला अग्निशामक दलही पाणीच वापरतं….

शेवटी पाणी ते पाणी आणि कागद तो कागद ( स्रोत  : आयुष्यावर बोलू काही  (कार्यक्रम) )

टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …

तळटीप -
: वाचलंतच ना इथपर्यंत… वाटलंच मला !!
:  पूर्वी रेडिओ पुणे स्टेशन वर ही फर्निचरच्या दुकानाची जाहिरात लागायची. आजूनही लागत असेल माहित नाही… त्यात “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…” अशा ओळी होत्या. त्या जाहिरातिच्या वेळेत मी नेमका अभ्यासात असायचो (नाहितर रेडिओवरच्या जाहिरातीकडे कशाला जातंय लक्ष..) तेव्हापासून जेव्हा जेव्हा “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं (रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…)”  हा वाक्प्रचार येतो तेव्हा पुढचं म्हणल्यावाचून (मनातल्या मनात का होईना) राहावत नाही.. (वाक्यात मधे कुठेतरी “स्वप्नासारखे सुंदर घर प्रत्यक्षात उतरते” अशा ओळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की आठवत नाईये. )

अर्थमैथुन : बांबूच्या वाटेवरचे घोडेस्वार

“आज माझी चांगलीच लागली” ऐकला असेलच हा वाक्यप्रयोग तुम्ही. वापरलाही असेल कदाचित. पाचावर धारण बसली, बिकट परिस्थिती आली, तोंडचं पाणी पळालं की माणसाला हे शब्द सुचतात. काहीतरी बेक्कार किस्सा झालेला असतो आणि आपण संकटात सापडलेलो असतो. परीक्षा असते आणि ऑप्शनला टाकलेल्या भागातलेच प्रश्न अनिवार्य म्हणून आलेले असतात, गोंडस मैत्रिणीसोबत फिरताना गर्लफ्रेंड समोर आलेली असते किंवा बकुळीच्या फुलांचा खजिना घरच्यांना सापडण्यापासून थोडक्यात वाचलेला असतो. अशा वेळी “आज माझी चांगलीच लागली” हे शब्द सुचणं रास्तच आहे.

हो… ठीक आहे… लागली  वगैरे सगळं ठीक आहे…
पण नक्की काय लागली???

जर तुम्हाला सुचलेलं पहिलं उत्तर सांगण्यासारखं नसेल ( नसणारच !! ) तर खंग्राज्युलेशचंद (विंग्रजीत कॉंग्रॅज्युलेशन्स) वुई ( विंग्रजीत वी, स्रोत : तर्खडकर भाषांतरपाठमाला वा तत्सम पुस्तिका ) हॅव ए विनर !!! (  हा कंस वाचू नये. )

आता थोडेसे लहान (किंवा सभ्य, शामळू वगैरे) झालात तर तुम्हाला यातून एक वाट दिसेल. हीच ती वाट. काही श्यंकट आलं की आपली लागते ती म्हणजे वाट (वाटलंच होतं…)!  तसं बघायला गेलं तर वाट ही तिच्या जागी स्थिर. “ही वाट कुठे जाते?” वाल्या विनोदाप्रमाणे, ती कुठेही जात नाही. याउलट, प्रवासादरम्यान आपणच कोणत्यातरी वळणावर एखाद्या वाटेला लागतो. अगदीच जर आपणच लागायचं असेल तर मग वाट सोडून आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. बरा वाईट कसाही असो पण आपण मात्र मार्गी लागतो. ( तसे आपण नादीही लागतो, पण  नादच खुळा त्याला आपण तरी काय करणार ! ) (संगतीलाही लागतो, हरकत नाही… फक्त काना,मात्रा, वेलांटीचं भान असू द्या.. नाहीतर…. असो…..)

हां. तर मार्ग… हा मार्ग चांगला असेल तर प्रश्नच नाही. (प्रश्न असा की उत्तर काय ? )  पण जर मार्ग वाईट असेल तर मात्र आपली पार वाट लागून आपण रस्त्यावर येऊ शकतो आणि कालांतरानं धक्क्यालाही लागू शकतो… ही धक्क्याला लागायची वेळ येईपर्यंत माणसाचं प्रचंड आर्थिक नुस्कान (तस्कर, स्कंधस्नायू, मुस्काड, बिस्किट, स्कोडा, स्किन, स्किल, स्क्रू … स्क्या स्क्या स्क्या !!! स्कायपण स्काललंय :D ) होऊ शकतं. एवढ्या मेजर स्केलवर (पुन्हा स्क…) निस्कान (…) काय असं  फस्कन (…) होत नसतं… या धक्क्याला लागेपर्यंतच्या वाटेवर अनेकदा घोडे आणि बांबू लागलेले असतात.

आता घोडा आणि बांबूच का ?? मी फार खोलात(!) जाणार नाही. घोडा हे तसं श्रीमंती जनावर, शिवाय हा रेसमधेही असतो, घोड्यांच्या रेसवर मजबूत पैसा लागतो(!) त्यामुळे घोड्याचा त्यातल्यात्यात पैशाशी किंवा नुकसानाशी संबंध लावता येईल.  पण बांबूचं काय???

बांबू हे पांडांचं आवडतं खाद्य, (पांडा हा एक अस्वलप्रजातीय प्राणी आहे (माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यानुसारच तो मऊही आहे…), तोही नामशेष होत चालला आहे. त्यांची लागणारी वाट थांबवली नाही तर लवकरच पांडा ही प्रजाती धक्क्याला लागेल…) पांडा चीनमधे असतात, बांबूही… चीनी बनावटीच्या वस्तू कशा… स्वस्त पण सहा महिन्यात बत्तीगुल… मग आपलं नुसकान !!! (नुस्कान, नुस्कान, नुस्कान… उद्या शंभर वेळा लिहून आण !!! ) म्हणून बांबूही आर्थिक तोट्याशी निगडित (निगडी सोडून आमची इतर कोठेही शाखा नाही…).

एवढं लिहून मी ही बांबूंची लागवड संपवतो.

तरी, सूज्ञांनी (आणि तुम्हीसुद्धा) या बांबूच्या वाटेवरील घोड्यांचा लागेल तसा वापर करा आणि काही लागलंच तर निःसंकोचपणे मागून घ्या….

आपला,

नॅकोबा.