भर दुपारी मस्त फेसबुकावर माफियांच्या विश्वात खळबख माजवत होतो. जरा वेळाने उर्जा संपल्यावर म्हणलं आता जरा शेतीकडे वळावं, शेवटी काही झालं तरी आपण शेतीप्रधान देशाचे नागरिक ! शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय कोण म्हणतं.. इकडे मीतर रोज माझ्या मित्रांच्या शेतावर खतपाणी करतोय!! सध्या इस्टर म्हणून सवंगड्यांना फुकटची खोटी रंगीत अंडी पाठवतोय आणि माझे मित्रही हिरीरीने या शेतीप्रकल्पात सहभागी होत आहेत. आहे की नाई मज्जा. जोश्याच्या शेतावरच्या कोंबड्या भुकेल्या आहेत पाहून नेने त्यांना पौष्टिक धान्य खाऊ घालताहेत. वाळून गेलेलं धान्य परत उगवता येतंय . सारं काही आलबेल आहे.
फार्मविलची सध्या बेक्कार हवा आहे. फेसबुकावरचा जो दिसतोय तो शेतावर काय घडलंय सांगतोय. दिवसातला थोडा वेळ काढून या खोट्याखोट्या शेतावर लक्ष देतोय, कापणी करतोय, प्राणी पाळतोय वगैरे वगैरे. माझ्य़ासारखे काही गेमाड लोक तर व्यसन लागल्यासारखे खेळतायत. काही जण तर दमड्या मोजून फार्म कॅशही घेत असतील. आणि फार्मविलचे निर्माते झिंगा गेम्स तर अशा खेळांवर खोऱ्यानं पैसा ओढतायत.
खरंतर ही पोस्ट दुसरंच काहीतरी लिहायला घेतली होती पण काहीतरी वेगळंच घडलं. वरचं ते शेतीप्रधान देशाचं वाक्य लिहिलं आणि पेपरात वाचलेल्या बातम्या आठवल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आणि कर्जमाफीसाठी नेत्यांनी चालवलेल्या खेळांच्या. आणि आपण खेळातल्या एका खोट्या जगात सर्वकाही आलबेल असल्यासारखं वागतोय या भावनेने क्षणभर मनाला चटका बसला. आणि डोक्यात उगाचच एक विचार आला, की समजा उद्या एखाद्या ना-नफा-ना-तोटा संस्थेनं असले व्यसनमयी गेम काढले आणि त्यातून मिळाणारे थेट किंवा जाहिरातीचे उत्पन्न सत्कार्यासाठी वापरलं तर काय होईल? शिवाय चार सहा डिझायनर्स डेवलपर्सना नोकरी मिळेल ती वेगळीच.
गेली दहा वर्षं वेगवेगळे गेम खेळतोय, निर्लज्जपणे, पुढेही खेळीन, त्याच निर्लज्जपणानं… पण आज पहिल्यांदाच मी कन्फ्यूज झालोय. आणि गेम्स वाईट कसे नाहीत, उलट त्यांचा फायदेशीर वापर कसा करता येईल हे स्वतःला पटवू पाहतोय. मी गुत्त्याच्या मालकाकडून जनकल्याणाची अपेक्षा करतोय का? का गेम्स खरंच वाईट असतात… माझ्या गेमर सांप्रदायिकतेवर घाला घालण्याचं काम इतके दिवस आई करायची, आज मी नकळत तेच करतोय… का ते माहीत नाही, म्हणूनतर इतका गोंधळलोय… ही पोस्ट मला अजून एकही तास ड्राफ्टमधे ठेवायची नाहीये म्हणून तुटकच संपवून मोकळा होतोय.
इतकंच !


