एकटाच की जोडीनं?

चाललायस खरा, पण येताना एकटाच येणार…… की जोडीनं???

अमेरिकेत येण्यापूर्वी हा प्रश्न बऱ्याच वेळा ऐकला होता. या एकाच प्रश्नातून अनेक वेगवेगळ्या भावना व्यक्त होत असतात. प्रश्न विचारणाऱ्याचं प्रश्न विचारला गेलेल्या व्यक्तीशी जे नातं असतं त्यानुसार या प्रश्नाच्या गर्भितार्थात बदल होतो. घरचे किंवा नातेवाईक जेव्हा विचारतात तेव्हा त्यात जरा काळजी असते. कोणाचातरी कोणीतरी कुठेतरी जाऊन काहीतरी करून बसलेला असतो. तो प्रकार आपल्या बाबतीत घडू नये असं त्यांना वाटत असतं.  जेव्हा मित्र विचारतात तेव्हा त्यात एक चावट आशावाद दडलेला असतो.  लहान भाऊ जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा त्यात “तू जमव, म्हणजे माझी लाईन क्लिअर” असा सुप्त संदेश असतो. काही मंडळी असतात, जी तुम्हाला विनाकारण ओळखत असतात. तीही विचारतात. एकटाच येणार की जोडीनं. त्यात खोचकता वगैरे ठासून भरलेली असू शकते. काही जणं केवळ विचारायचं म्हणून विचारतात. कदाचित जोडीनं येणार म्हणला तर काय घ्या!  प्रश्न आला की आपलं ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही म्हणायचं हा नित्यक्रम मी नेटानं पाळला. कारण एकूणच, या प्रश्नात अनपेक्षित असं काही नव्हतं…..

गेल्या महिन्यापर्यंत…..

मी लवकरच सुट्टीवर जाणार ही बातमी ऑफिसात पसरली अन् साधारण दिवसभरात तीन-चार लोकांनी मला हाच प्रश्न विचारला तेव्हा मात्र माझी विकेट उडाली. अमेरिकेतून भारतात सुट्टीवर येतानाही हा प्रश्न येऊन आदळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.  कल्पना करा… आंघोळीसाठी तुम्ही मोरीत शिरलाय, गंगेच यमुनेचैव म्हणत तुम्ही पहिला तांब्या अंगावर घेणार इतक्यात एखाद्या अज्ञात शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही परस्पर उत्तर ध्रुवावर येऊन पोहोचलाय… माझी अगदी इतकीही खतरनाक परिस्थिती नव्हती, पण म्हणून तुम्ही अशा रोचक आणि रंजक कल्पना करू नयेत असा नियम नाही. सुविचार असा, की  आयुष्य, विश्व आणि इतर सर्व गोष्टींचं उत्तर बेचाळीस आहे, अन् उत्तर ध्रुवावर टॉवेल सहजासहजी मिळत नाही.

हेहेहे. विषयांतर खतम…

त्याचं काय आहे, की कॅलिफोर्निया बे एरियात चिक्कार भारतीय मंडळी आहेत अन् कायम नव्यानं येत असतात. एकूणच, एखादा सुकुमार (ब्याचलर) बंडू सुट्टीसाठी  एकटा मायदेशी जाणं अन् येताना सपत्नीक येणं (किंवा आल्यानंतर आपण आता ब्याचलर नसल्याचा जाहीरनामा देणं) ही संकल्पना सिलिकॉन व्हॅलीला  आजिबात नवीन नाही. (इट्सा फमिलिअर फिणॉमेणॉ युसी)

पहिल्याच प्रश्नानं गारद झालेल्या माझा या प्रश्नकर्त्यांनी पुढच्या काही वाक्यातच पूर्ण वैराचिक फडशा पाडला… त्याचा हा साधारण सारांश

प्रश्नकर्ते: काही प्रश्न विचारतो तुला, आणि मग आम्हीच सांगतो तू एकटा येणार की जोडीनं !

मी: निरुत्तर…

प्रश्नकर्ते: किती दिवस चाललायस?

मी: एक महिना.

प्रश्नकर्ते: (निश्चिततादर्शक स्मितहास्य) काही खरं नाही … बरं वय काय बाळ तुझं?

मी: चोवीस… बहुतेक……… किंवा पंचवीस…..( मनातल्या मनात – दहातून सहा गेले राहिले…..)

प्रश्नकर्ते: हा पहिला प्रश्न. पालकांबरोबर जिथे कुठे जाशील तिथे. मग एकदा गाडी वळली की तिथून पुढे हायवेच आहे.

मी: निरुत्तर… (मनातल्या मनात- खरंय…. काही खरं नाही)

प्रश्नकर्ते: घरच्यांनी या विषयावर तुझ्याशी बोलणं अचानक कमी केलंय?

मी: निरुत्तर… (हो बहुतेक, किंवा नाही…. खरं की काय???  याचा अर्थ काय समजायचा ???)

प्रश्नकर्ते: इतक्यात तुझ्या ओळखतल्या कोणाचं लग्न झालंय?

मी: (बारीक आवाजात…) हो…

प्रश्नकर्ते: हम्मम्मम्म् . (निश्चिततादर्शक स्मितहास्य, यावेळी जाणवणारी निश्चितता पूर्वीपेक्षा साधारण दसपट ) आता शेवटचा प्रश्न…

प्रश्नकर्ते: कोणा दूरच्या नातेवाईकांनी इतक्यात तुझ्या पालकांशी संपर्क साधलाय??

मी:  मी गप्प, चेहेरा मात्र उद्गारतोय ओमायगॉड !!!

प्रश्नकर्ते: अभिनंदन

मी: गार.

या फैरीत चांगलाच घायाळ झालो असतो तरी आता मात्र सावरलो आहे. आता प्रश्न विचाराल तर उत्तर तयार आहे. तेच आपलं नेहेमीचं… ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही नाही म्हणायचं.

~नॅकोबा

Leave a Reply